Tuesday, August 30, 2016

मुंबईचे आद्द शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठत

मुंबईच्या विकासाची वाट स्वकियांना दाखविण्यासाठी मुंबईच्या रेल्वेपासून अनेक उपक्रमात आघाडीवर असणारे… स्थानिकांची विकासाची बाजू समजून घेऊन त्यांचे प्रतिनिधित्व कारणारे नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांची १५१ वी पुण्यतिथी ३१ जुलै रोजी आहे. यानिमित्त त्यांच्या महान सेवाभावी कार्याचा हा परिचय.

मुंबईचे आद्य शिल्पकार व एक थोर समाजसेवक तसेच शिक्षणप्रेमी म्हणजे नाना शंकरशेठ. त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. ते देवज्ञ ब्राह्मण व्यापारी कुटुंबातील होते. सचोटीने व्यापार करून मोठा धनसंचय करावा व त्याचा उपयोग परोपकारासाठी करावा, हे या कुटुंबांचे अनेक पिढ्यांचे जणूकाही तत्वच होते. त्यामुळे सर्वत्र त्यांना प्रतिष्ठाच होती.

नानांचे वडील व्यापारासाठी मुंबईत आले. त्यांची आई भवानीबाई या त्यांना लहानपणीच सोडून गेल्या. त्यांचे मातृछत्र लहानपणी हरपल्यावर शंकरशेठजींनीच नानांचे उत्तम शिक्षण व्हावे, यासाठी विद्वानांकडून तत्कालिन भारतीय पारंपरिक शिक्षण व नावाजलेल्या इंग्रजी शिक्षणाची सोय घरीच केली. नानांची बुद्धी अत्यंत कुशाग्र होती. त्यांचे भाषांवरचे प्रभुत्व दांडगे होते. ते संस्कृतमध्ये आणि इंग्रजीत उत्तम लिखाण करीत असत. नानांचे वडील १८२२ मध्ये म्हणजे त्यांच्या १९ व्या वर्षीच वारले व नानांवर तरुणपणीच सर्व जबाबदारी पडली. जी त्यांनी अत्यंत समर्थपणे पेलली.

सार्वजनिक कार्याचा प्रारंभ

१८१९ मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन संपूर्ण मुंबई परिसराचे गव्हर्नर झाले. दरबार व मेजवाण्यांच्या निमित्ताने त्यांची व नानांची गाठ पडली. एल्फिन्स्टनने मुंबई परिसरात आधुनिक शिक्षणाचे पर्व सुरु करण्याचा ठाम निर्धारच केला होता. नानांची बुद्धिमत्ता व प्रगल्भता यामुळे एल्फिन्स्टनने यांच्या प्रयत्नामध्ये नानांना महत्वाचे स्थान दिले होते. त्यांच्या या प्रयत्नानंतर १८२२ मध्ये मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तके मंडळाची स्थापना झाली आणि त्यांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात झाली.

शिक्षण क्षेत्राला दिली चालना

हैंदशाळा आणि शाळापुस्तके मंडळाचे १८२४ रोजी बॅाम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटीत रूपांतर झाले. पुढे त्यांनी सदाशिव छत्रे व जगन्नाथ शास्त्री यांच्या सहकार्याने मुंबईत ठिकठिकाणी शाळा उघडल्या. नानांकडून हुशार मुलांना परिक्षेनंतर शेला, पाणोटी, रेशमी व जरीचे कपडे बक्षीस स्वरूपात दिले जात. त्यामुळे मुलांची संख्या वाढण्यात व शिक्षणाचे कार्य वाढविण्यात मदत झाली. पुढे १८३४ साली मिशनरी डॉ. विल्सन यांच्या मार्गदर्शनावरून नानांनी आपल्या बंगल्याच्या आवारात मुलींच्या शाळेला जागा दिली. इतकंच नव्हे तर आपल्या घरातील मुलींनाही शाळेत पाठविले.

मातृभाषेचा पुरस्कार

नाना शंकरशेठ व एल्फिन्स्टन यांनी मातृभाषेत शिक्षण दिले जावे त्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच मराठी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये देवनागरी भाषांची प्रथमच क्रमिक पाठ्यपुस्तके छापली गेली. त्यामुळे संपूर्ण लोकांसाठी आधुनिक शिक्षणाची दारे खुली झाली. १८२७ मध्ये एल्फिन्स्टन इंग्लंडला जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या सत्कारासाठी जो निधी गोळा केला गेला, त्यातून एल्फिन्स्टन कॉलेज व शिक्षण संस्था कार्य करू लागल्या. याच एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पुढे थोर महापुरुष निघाले. ज्यात दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यासारख्या अनेकांचा समावेश आहे. त्यांनी पुढे देशात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले.

आधुनिक शिक्षणाला प्रोसाहन

नाना शंकरशेठ यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेक विविध लोककल्याणकारी सुधारणांचा जणूकाही मुंबईत पायाच घातला. त्यांनी १८४५ मध्ये जे. जे. रुग्णालय व ग्रॅट मेडिकल कॉलेजची स्थापना, १८४९ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय व संस्थाद्वारे एतदेशीयांच्या कल्याणशाळा, १८५१ मध्ये सर्वांना संस्कृतचे शिक्षण खुले करणारे पूना संस्कृत कॉलेज म्हणजे आजचे डेक्कन कॉलेज, १८५५ मध्ये पहिले विधी महाविद्यालय, १८५७ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट व बॉम्बे युनिवर्सिटीची स्थापना असा नानांचा कर्तुत्वाचा आलेख पुढे चढत गेला. भारतातील आधुनिक शिक्षणाचा पाया नाना शंकरशेठ यांनीच रचल्याचे दिसून येते.

स्वातंत्र्य अस्मितेचा आरंभ

नव्या युगाला आरंभ करणारे आधुनिक काळात जे थोर महापुरुष झाले. त्यात नाना शंकरशेठ अव्वल दर्जाचे होते. जेव्हा देशात इंग्रजांची सत्ता होती तेव्हा भारतीय लोकांना इंग्रजांच्या दबावाखाली जगावे लागत होते. देशाच्या विकासासाठी आणि इंग्रजांनाकडून झालेल्या पराभवाची झळ हाच स्वातंत्र्य अस्मितेचा प्रारंभच होता. इंग्रजांच्या अंमलाखालील भारतासाठी काय आवश्यक आहे, याची जाणीव असल्यामुळे त्यांनी शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी आपले महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षणांच्या क्षेत्रात विकासाची बिजे रोवली होती. त्याचा पुढे स्वातंत्र्याच्यावेळी फायदा झाल्याचे दिसून येते.

मुंबईला प्रकाशात आणणारे नाना

सात बेटाच्या वर बसलेल्या मुंबई शहराच्या विस्तार व विकासामध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. मुंबईतील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. त्याचप्रमाणे बॉम्बे स्टीम नॉव्हिगेशन कंपनीची स्थापना, नाटकाचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण व मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी गॅसबत्तीची सुरुवात त्यांच्या प्रयत्नाने झाली. त्यामुळे मुंबईला प्रकाशमान करण्याचा मानही त्यांनीच पटकावला.

क्रूर प्रथेच्या उच्चाटनात नानांचा पुढाकार

पूर्वी आपल्या देशात वाईट चालीरीती होत्या. ज्यामुळे निर्दोषांना त्याची झळ सोसावी लागत असे. त्यातील एक प्रथा म्हणजे सती जाण्याची प्रथा होय. १८२८ मध्ये कोलकातामधील लॅार्ड बेंटिग गव्हर्नर जनरल झाला. त्यावेळी बंगालमध्ये राजाराम मोहन रॉयने सतीच्या अमानुष प्रथेच्या उच्चाटनाबाबत सरकारने हस्तक्षेप करावा, यासाठी प्रयत्न केला होता. तेव्हा राजाराम मोहन रॉय आणि नाना शंकरशेट यांनी ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज करून या प्रथेचे उच्चाटन करण्याची विनंती करून आपली मते ठामपणे मांडली होती.

दानशूर व्यक्ती

नाना शंकरशेठ यांनी व्यापारी कुटुंबात जन्म घेतल्याने ते व्यापार करून धनसंचय करायचे आणि ते पैसे देणगी स्वरूपात जनकल्याणासाठी देत होते. म्हणूनच त्यांना मुंबईतील दानशूर या नावाने ओळखले जात. त्यांच्या या देणग्यामुळे शहरातील मोठ्या शिक्षण संस्था आज चालताना दिसत आहेत. त्यांनी अनेक संस्थाना देणग्या दिल्या. त्यापैकी रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई, व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तूसंग्रहालय, मुंबई विद्यापीठ अशा संस्थाना देणग्याच्या स्वरुपात मदत केली.

नानाच्या गौरवार्थ जिजामाता बागेत उभारला पुतळा

नाना शंकरशेठ यांचा महान सेवाभावी कार्याने भारावून जाऊन लोकांनी त्याचा पुतळा उभारणीसाठी स्वच्छेने २५ हजार रुपये गोळा केले होते आणि त्यांच्या गौरवार्थ जिजामाता बागेत पुतळा उभारण्यात आला होता. नानांचे कार्य आणि दानशूरपणा पाहून इंग्रजांनीही त्यांचा मानसन्मान केला होता. त्यांच्याबद्दल कितीही लिहिले तरी ते थोडंच आहे. कारण त्यांनी निस्वार्थीपणे सढळ हस्ते आपली संपत्ती दान केली. म्हणूनच मुंबईचे शिल्पकार म्हणून नानांचे नाव आजही घेतले जाते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विन्रम आदरांजली.

-नितीन शं. बिनेकर,

Sunday, August 28, 2016

मुंबई विद्यापीठ : एक सिंहावलोकन

मुंबई विद्यापीठाच्या 159 व्या वर्धापन दिन व 160 व्या वर्षमहोत्सवाचा शुभारंभ 18 जुलै 2016 रोजी विद्यापीठात एका शानदार समारंभात झाला. विद्यापीठाला 159 वर्षाची समृद्ध आणि वैभवशाली परंपरा लाभली आहे. हे भारतातील सर्वात जुने विद्यापीठ असून भारतातील पहिल्या तीन विद्यापीठांपैकी एक असा मान मुंबई विद्यापिठाने पटकवला आहे. विद्यापिठाच्या आजवरच्या वाटचालीचे हे एक सिंहावलोकन.

मुंबई विद्यापीठाची स्थापना सन चार्ल्स वुड यांच्या इ.स. 1854 च्या शिक्षणविषयक कायद्याअंतर्गत डॉ. जॉन विल्सन यांनी 18 जुलै 1857 रोजी केली. पूर्वी बॅाम्बे असे नामकरण होते, पण बॉम्बेचे मुंबई झाल्यामुळे 4 सप्टेंबर 1996 रोजी ‘बॅाम्बे’ विद्यापीठाऐवजी मुंबई विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले.

ऐतिहासिक परंपरा

विद्यापिठाचे स्वरुप सुरुवातीस वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करुन परीक्षा घेणारी व पदवी देणारी संस्था असे होते. त्यावेळी मुंबई राज्याचे गव्हर्नर हे विद्यापिठाचे कुलपती असत. मुंबईचे पहिले गव्हर्नर लॉर्ड जॉन एन्फिन्स्टन हे मुंबई विद्यापिठाचे प्रथम कुलपती तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम यार्डले हे पहिले कुलगुरू होते.

पहिले पदवीधर

माध्यमिक शालान्त परीक्षा कायदा होईपर्यंत मॅट्रिकच्या परीक्षा घेण्याचे काम 1948 पर्यंत मुंबई विद्यापिठाकडून होत होते. 1859 साली पहिली मॅट्रिकची परीक्षा झाली. या परीक्षेत 132 मुलांपैकी 22 मुले उत्तीर्ण झाली. प्रथम वर्ष (कला) परीक्षा 1881 मध्ये झाली. त्यात पहिल्या मॅट्रिकच्या तुकडीतील 15 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सातपैकी पहिल्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात सहा विद्यार्थी बसले. त्यापैकी चार उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होण्याचा हा मान महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक यांनी पटकावला.
मदतीचा हात

पहिल्या 17 वर्षांच्या कालावधीत विद्यापिठाची स्वत:ची इमारत नव्हती. विद्यापिठाची कचेरी टाऊन हॉलमध्ये होती. सिनेटच्या बैठका व पदवीदान समारंभही याचठिकाणी होते. 1869 मध्ये कावसजी जहाँगीर रेड्डीमनो यांनी विद्यापिठास इमारतीसाठी एक लाख रुपयाची देणगी दिली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यापिठाच्या पदवीदान सभागृहास ‘सर कावसजी जहाँगीर हॉल’ असे नाव देण्यात आले. त्याचप्रमाणे 1864 मध्ये प्रेमचंद यांनी ही दोन लाख रुपयांची देणगी ग्रंथालयासाठी दिली. काही काळानंतर प्रेमचंद यांनी आपल्या मातोश्री राजाबाई यांच्या


स्मरणार्थ मनोरा बांधण्यास आणखी दोन लाख रुपये दिले. त्यामुळे त्यांच्या आईच्या नावाने ‘राजाबाई टॉवर’ असे नामकरण करण्यात आले.
शिक्षण पद्धतीत अग्रेसर
जगभरात शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. हे बदल वेळोवेळी मुंबई विद्यापिठाने अंगिकारले. या बदलांची योग्य सांगड मुंबई विद्यापिठाने घातली आहे. मुंबई विद्यापिठातर्फे 56 पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. यात कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, मानसशास्त्र व्यवस्थापन, ललित कला, विज्ञान, भाषा कायदा यासारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच प्रसार माध्यमे, विमान उड्डाण असे नवनवीन अभ्यासक्रमही शिकविले जातात. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावे याची कास धरणाऱ्या मुंबई विद्यापिठाने कम्युनिटी कॉलेजेस सुरु केली आहेत. विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख अभ्यासक्रम शिकविता यावेत म्हणून नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु केले आहेत. उच्च दर्जाचे शैक्षणिक संशोधन व्हावे यासाठी जवळपास चार लाखाहून अधिक रिसर्च जर्नल्स ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहेत.

भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळावी यासाठी सूक्ष्म विज्ञान क्षेत्रात आमुलाग्र बदल करत नॅनो सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे अद्ययावत विभाग सुरु करण्यात आले आहेत.

कार्यक्षेत्रात वाढ

मुंबई विद्यापिठाने 1913 सालापासून पदव्यूत्तर शिक्षण देण्याचे कार्य सुरु केले. महाविद्यालयासाठी लागणारी क्रमिक व अन्य पुस्तके तयार करणे ही कार्ये विद्यापिठाकडेच होती. पुढे 1928 च्या अधिनियमानुसार विद्यापिठाच्या सिनेटची पुनर्रचना अधिक प्रातिनिधीक स्वरुपाची झाली. पदव्यूत्तर शिक्षण व संशोधन हे विद्यापिठाच्या कक्षेत आले. त्यानुसार संलग्न महाविद्यालयात पदव्यूत्तर शिक्षण विद्यापिठाच्या विभागाद्वारे देण्यास प्रारंभ झाला. यामुळे विद्यापिठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आजच्या घडीला 729 महाविद्यालये असून 56 विद्यापीठ विभाग आहेत. यातील विद्यार्थ्यांची संख्या सात लाखाहून अधिक आहे. महाराष्ट्र शासनाने 1974 मध्ये राज्यातील सर्व विद्यापिठाच्या कार्यप्रणालीत एकसूत्रता आणण्यासाठी कायदा केला. यामुळे मुंबई विद्यापिठाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाली.

159 वर्षात विद्यापिठाने दिले अनेक महापुरुष

1857 च्या उठावात देशात ब्रिटीश राजवटी विरोधात जनतेमध्ये विद्रोह निर्माण झालेला होता. या परिस्थितीत विद्यापिठाची स्थापना झाली. जिथे अनेक विचारवंत क्रांतीकारक आणि महापुरुष निर्माण झाले. त्यांनी ब्रिटीश जुलमी राजवटीचा सूर्यास्त होण्याची सुरुवात झाली. या काळात मुंबई विद्यापिठातून शिकलेल्या अनेकांनी जगाच्या पाठीवर आपल्या कर्तृत्वाची छापच उमटवली आहे. ज्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादाभाई नौरोजी, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक दिग्गजासंह विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले दिग्गज या विद्यापिठाचे विद्यार्थी होते. ही बाब केवळ मुंबई विद्यापिठालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला भूषण वाटेल, अशीच आहे.
विद्यापिठाच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

-नितीन बिनेकर,

(9970420736)

Thursday, August 25, 2016

सरदारगृह : भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र

 
 भारतीय जनतेमध्ये स्वराज्याची, राष्ट्रवादाची जाणिव निर्माण करणारे तसेच स्वराज्य मिळविण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे, महाराष्ट्रातील राष्ट्रीय नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १ ऑगस्ट रोजी ९६ वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने त्यांनी मुंबईतील सरदारगृहामधून चालविलेल्या  स्वातंत्र्य चळवळीचा व त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा हा परिचय...



स्वातंत्र्य चळवळीचा व त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा हा परिचय...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. दापोलीजवळ चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होते. टिळकांचे संपूर्ण शिक्षण पुण्यातच झाले. १८७२ मध्ये त्यांचा विवाह सत्यभामाबाई सोबत झाला. १८७७ मध्ये टिळक यांनी डेक्कन कॉलेज मधून बी.ए व १८७९ मध्ये एल.एल.बी. शिक्षण पूर्ण केले . राष्ट्रीय शिक्षणाच्या कल्पनेतून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याबरोबर टिळक, आगरकर, आपटे आणि नामजोशी यांनी १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.

केसरी व मराठा वृत्तपत्राची सुरुवात

सर्वसामान्य लोकांपर्यत आपले विचार पोहचावेत आणि लोकांवर इग्रंजांकडून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडता यावी म्हणून २ जानेवारी १८८१ रोजी इंग्रजी भाषेत मराठा आणि मराठी भाषेत केसरी वृत्तपत्रे सुरु केले. पुढे १८८२ मध्ये टिळक व आगरकर या संपादकांना १०१ दिवसांचा डोंगरी येथे कारावास झाला. याचं कारण म्हणजे केसरीच्या सिंहगर्जनेने इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते. लोकमान्य टिळकांनी दोन्ही वृत्तपत्रांच्या उपयोग लोकजागृतीसाठी केला. केसरी व मराठा ही स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांची ही शस्त्रेच होती.

शिवजयंती व गणेशोत्सवाचा आरंभ

निद्रिस्त सामाजाला जागे करून. त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याचा दृष्टीने आणि सर्व जातीपातींच्या लोकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये सार्वजनिक गणपती उत्सव आणि रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची डागडुजी करून १८९६ मध्ये शिवजयंती हे दोन राष्ट्रीय उत्सव सुरु केले. या उत्सवातून भाषणे आणि किर्तनाद्वारे लोकमान्य टिळकांनी राष्ट्रजागृतीचा संदेश दिला आणि इंग्रजाविरुद्ध जनशक्ती उभी केली. भारतातील जनतेत स्वधर्म, स्वभाषा आणि स्वदेशी यांचा अभिमान निर्माण व्हावा ही या मागील प्रेरणा होती.

मुंबईतील टिळकांचे वास्तव्य

टिळकांचे पूर्वी पासून मुंबईशी खूप घनिष्ट संबंध होते. जेव्हा मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सवाची धामधूम १८९५ च्या सुमारास वाढली व लोकमान्य मुंबईत येऊ लागले. तेव्हापासून पुढे १० ते १२ वर्षे ते त्यांच्या परमस्नेही दाजी आबाजी खरे यांच्याकडे मुक्काम करीत. दाजीसाहेब हे वकील होते व गिरगावातील आंगरेवाडीत राहत. टिळक आणि दाजीसाहेब हे दोघेही बालमित्र होते. दाजीसाहेब यांचा वकिलीचा व्यवसाय जोमाने चालावा म्हणूनच पुण्याहून मुंबईत आले होते. दाजीसाहेब हे नेमस्त व सुधारक वृत्तीचे होते. टिळकांवर आलेल्या प्रत्येक संकटात दाजीसाहेब सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे राहत.

सरदारगृहाचा इतिहास 

१८०७ सालच्या सुरत काँग्रेस अधिवेशनामुळे या ठिकाणची लोकप्रियता अफाट वाढली व त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्याही वाढली. त्यामुळे दाजीसाहेबांच्या घरी राहणे त्यांना प्रशस्त वाटेनासे झाले. याच सुमारास सरदारगृहाचे मालक विसुभाऊ सावळेकर यांनी त्यांना आपल्या भोजन निवासात राहण्याची गळ घातली. तेथून पुढे लोकमान्यांचा मुक्काम सरदारगृहात होऊ लागला. विसुभा ऊर्फ तात्यासाहेब सावळेकरांनी १८९२ साली पुण्यात किर्लोसकर नाट्यगृहाजवळ हे भोजननिवास सुरु केले. पुण्यातील कोणत्याही भोजनगृहापेक्षा सरदारगृहातील भोजनव्यवस्था अधिक चांगली होती. पंरतु त्यांचा लाभ घेणारे लोक तितके नव्हते पुढे प्लेगच्या साथीत साळवेकरांनी सरदारगृह मुंबईला नेले. १८९८ साली ग्रॅंटरोड येथे सरदारगृहाचे स्थलांतर झाले. ती जागाही अपुरी पडू लागल्यावर १९०२ साली अधिक प्रशस्त अशा सीताराम बिल्डिंग मध्ये आले. सावळेकर टिळकांचे चाहते होते. त्या काळात टिळकांशी संबंध ठेवणे धोक्याचे होते. पण विसूभाऊंनी कशाचीच तमा बाळगली नाही . १९०८ रोजी राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्याच्या वेळी टिळकांना सरदारगृहात अटक झाली. विसुभाऊ स्वतः अगत्यशील होते. अतिथी देवो भव या ब्रीदाने वागल्यामुळे आता सरदारगृहाला ही जागाही कमी पडू लागली . तेव्हा त्यांनी शेजारील रिकामी जमीन विकत घेऊन त्यावर आपल्या पसंतीनुसार १९१२ ला सरदारगृह बांधले ते आजचे सादगृह. पण विसुभाऊ एवढे टिळक भक्त की या नवीन इमारतीत चौथ्या माळ्यावर त्यांनी टिळकांसाठी दोन खोल्या राखून ठेवल्या.

सरदारगृह : टिळकांचे दुसरे घर

 
लोकमान्य टिळक सरदारगृहाला आपले दुसरे घर असे म्हणत. राष्ट्रीय पक्षाचे अनेक पुढारी मुंबईतल्या सादगृहात टिळकांना भेटायला येत होते. पुढे बघता बघता सरदारगृह स्वातंत्र चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनून गेले. या ठिकाणी टिळक आणि त्यांचे सहकारी मित्र स्वातंत्र्य चळवळीची योजना आखत असत. या सरदारगृहात टिळकांना भेटणाऱ्यांमध्ये मौलाना शौकत अली, ॲनी बेझंट, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अशा अनेकांची गणना होते. त्याचबरोबर महात्मा गांधी व टिळक यांच्या दोन भेटी येथे झाल्या.

मुंबईत टिळकांच्या शिक्षेला विरोध

१८९८ ते १९०८ या दहा वर्षात लोकमान्य टिळकांनी अखिल भारतीय स्वातंत्रलढ्याची सूत्रे हाती घेतली. जहालचे नेते म्हणूनच काँग्रेस पक्षाला दिशा देताना स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही राष्ट्रीय चळवळीत चतु:सूत्री त्यांनी सांगितली. लोकमान्य टिळकांवर दुसऱ्यांदा राष्ट्रद्रोहाचा खटला झाला
भरला. त्यात त्यांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यावेळी मुंबईतील हजारो गिरणी कामगारांनी प्रथमच मुंबई बंद पुकारला. टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात स्वराज्याची चळवळ थंडावली होती. पुढे लोकमान्य टिळक शिक्षा पूर्ण करून बाहेर पडले तेव्हा त्यांनी होमरूल लीग हिंद स्वराज्य संघाची स्थापना करून लोकमान्यांनी भारतभर दौरे काढले आणि मरगळलेल्या चळवळीला तेज आणले. १९१६ मध्ये ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, व मी तो मिळविनारच’ हा महामंत्र त्यांनी उच्चारला स्वराज्यासाठी एक संघ फळी निर्माण केली.

सरदारगृहात टिळकांनी घेतला अखेरचा निरोप

लोकमान्य टिळकांची देशासाठी अविश्रांत धडपड, उतरत्या वयात जाणवणारी दगदग, मधुमेहाच्या आजाराचा जाणवणारा त्रास आता त्यांच्या प्रकृतीला सोसवत नव्हता. तरीसुद्धा ते स्वस्थपणे पूर्ण विश्रांती घेत नसत. जुलै १९२० मध्ये त्यांना हिवतापाने घेरले. आता त्यांना अंथरुणावर पडून राहण्याशिवाय उपाय नव्हता. त्यावेळी ते मुंबईतील सरदारगृहातच होते. १ ऑगस्ट १९२० चा दिवस उजाडला टिळकांनी आपले प्राण सोडले आणि भारताचा तेजस्वी सूर्य मावळला. ही बातमी सर्व मुंबईत व देशभर वाऱ्यासारखी पसरली मुंबईतील लोक हळहळले. शहरातील सर्व व्यवहार हरताळ पाळून बंदच होते. हळूहळू देशभरातील व मुंबईतील टिळकप्रेमी सरदारगृहाच्या बाहेर टिळकांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी जमा झाले. टिळकांचा अंत्यविधी चौपाटीच्या विस्तीर्ण वाळवंटात करण्याचे ठरविल्यामुळे मुंबईतील लोकांना बरे वाटले. मुंबईच्या इतिहासातील चौपाटीच्या वाळवंटात तो पहिला अग्निसंस्कार होता. सरदारगृहापासून लोकमान्य टिळक यांची पार्थिवयात्रा निघून चौपाटीवर आली. तेव्हा चौपाटीवर लोकांची प्रचंड गर्दी होती. यावेळी अंत्यसंस्काराला अनेक देशातील पुढारी उपस्थित होते. सर्वानी त्यांना श्रद्धांजंली वाहिली.

टिळकांचे जीवन दिव्य होते. लोकांच्या सन्मानाला आणि श्रद्धेला ते प्रत्येक दृष्टीने पात्र होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करून देशसेवा केली. शरीर थकलेले असतानाही त्यांचा लोकजागृतीसाठी सतत प्रवास, व्याख्याने, कार्यक्रम सुरुच होते. लोकमान्य टिळक आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत देशाकरिता लढत राहिले. अशा या महान नेत्यास विनम्र आदरांजली.

- नितीन बिनेकर
मो. ९९७०४२०७३६

Wednesday, August 24, 2016

भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक : डॉ. एस. आर. रंगनाथन

जगभरात ग्रंथालयशास्त्रात नावलौकिक करणारे प्रथम भारतीय ग्रंथपाल व ग्रंथालय चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन ज्यांच्या कर्तृत्वाने भारताला ग्रंथालय क्षेत्रात जागतिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अशा या महान व्यक्तीची 12 ऑगस्ट रोजी 124 वी जयंती आहे. या निमित्ताने ग्रंथालय प्रेमींसाठी त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा थोडक्यात परिचय. त्यांच्या जन्मदिनानिमित्त ग्रंथपाल दिन देशभरात साजरा केला जातो.


ग्रंथालय हे सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, यांचे महत्व ग्रंथालयशास्त्राचे पितामह डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले आहे. त्यासाठी ग्रंथालयाचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्य जनतेसाठी ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करून द्यायला हवी. यासोबतच वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व जनतेला वाचनाकडे प्रवृत्त केले पाहिजे, असा विचार डॉ.रंगनाथन यांनी सर्वप्रथम देशात रुजविला. देशातील ग्रंथालय चळवळीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

डॉ. रंगनाथन यांचा जन्म 12 ऑगस्ट 1892 रोजी तत्कालिन मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यातील शियाली या गावात झाला. शालेय शिक्षण शियालीला आणि महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. 1916 साली त्यांनी गणित या विषयात पदवी मिळविली. अध्यापनाची आवड असल्याने त्यांनी अध्यापन हे आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. १९१७ साली मद्रास विद्यापीठातील अध्यापन शास्त्रातील एल.टी. ही पदवी त्यांनी प्राप्त केली. या काळात एक कुशल प्राध्यापक संशोधक म्हणून त्यांनी मान मिळविला होता. 1924 रोजी प्रेसिडेन्सी कॉलेजमधील नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून सेवेत रुजू झाले. तेव्हा मद्रास विद्यापीठाने त्यांना सप्टेंबर 1924 ते जुले 1925 या कालखंडात ग्रंथालयाच्या प्रशिक्षणासाठी आणि ग्रंथालयाचा अभ्यास करण्यासाठी इंग्लडला पाठविले.

इंग्लंड येथे एक वर्ष राहून तेथील युनिव्हर्सिटी कॉलेजचा ग्रंथालय शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करून 1925 साली मायदेशी परतल्यावर डॉ. रंगनाथन यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या पुनर्रचनेचे कार्य जोमाने सुरु केले. विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे ग्रंथालयात चैतन्य निर्माण केले. म्हणजेच मद्रासच्या वास्तव्यात त्यांनी भारतीय ग्रंथालय चळवळीचा पाया घातला. मद्रास विद्यापीठाचा कायापालट करीत असतानाच त्यांच्या मनात सार्वजनिक ग्रंथालयाच्या प्रसाराचा विचार सुरु झाला होता. आर्थिक विकासाला आणि लोकशाहीच्या प्रगतीला शिक्षण प्रसाराइतकी मुलभूत कोणतीही प्रेरणा नाही, अशी त्यांची धारणा होती. समाजातील सर्वांना शिक्षण प्रसारासारखी म्हणजेच ज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यासाठी ग्रंथालयाइतके सहाय्यक दुसरे माध्यम कोणतेच नाही, अशी त्यांची धारणा होती. हे लक्षात घेऊन त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना 1928 रोजी केली. या संघाचे चिटणीस व पदाधिकारी म्हणून 1945 पर्यंत काम केले. या संघाच्या स्थापनेची आणि त्यांच्यातर्फे मांडल्या जाणाऱ्या विविध योजनापासून स्फूर्ती घेऊन इतर राज्यात ग्रंथालय संघ स्थापन झाले आणि सार्वजनिक चळवळीला नवीन तेज आले.

डॉ. रंगनाथन यांच्या विविध उपक्रमामुळे ग्रंथालयाच्या आवश्यकतेची जाणीव समाजात निर्माण होऊ लागली. त्यामुळे प्रत्येक राज्यात सार्वजनिक ग्रंथालये स्थापन करण्यासंबंधी कायद्याची जाणीव निर्माण झाली. त्यासाठी त्यांच्या पुढाकाराने मद्रासमध्ये सार्वजनिक ग्रंथालय कायदा अंमलात आला. त्यामुळे दक्षिण भारतात सार्वजनिक ग्रंथालयाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्यांच्या प्रेरणेने ग्रंथालय कायदा करणारे मद्रास हे भारतातील पहिले राज्य ठरले. डॉ. रंगनाथन यांचा कार्यकाळ भारतीय ग्रंथालय शास्त्रातील हे पर्व ऐतिहासिक ठरले आहे. आजही ग्रंथालय शास्त्रातील त्यांचे अजरामर व अमूल्य सिद्धांत, विविध सूत्रे, नियम आदर्श मानले जातात.

ग्रंथालयशास्त्राच्या विविध पैलूंपैकी प्रत्येक पैलूंची डॉ. रंगनाथन यांच्या वैचारिक परिसस्पर्शाने सोने झाले आहे . ग्रंथालयशास्त्रातील 1930 चे दशक विशेषत्वाने क्रांतिकारी ठरले. याच दशकात डॉ.रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्राचे पाच सूत्र कोलन क्लासिफिकेशन, क्लासिफाईड कॅटलॉग कोड, ग्रंथालय प्रकाशन प्रोलेगोमिना टू लायब्ररी, क्लासिफिकेशन थिअरी ऑफ लायब्ररी तसेच रेफरन्स सर्व्हिस अॅण्ड बिबलिओग्राफी इत्यादी अमूल्य ग्रंथाचे लेखन व प्रकाशन केले. त्यांनी या क्षेत्रातील घोडदौड पुढे चालू ठेवून त्यांनी 1931 मध्ये मद्रास बैलगाडीतील पहिल्या फिरत्या ग्रंथालयाची सुरुवात केली.

डॉ. रंगनाथन यांनी 1936 मध्ये प्रथम लायब्ररी बील मद्राससाठी तयार केले. ग्रंथालयशास्त्रातील प्रमाणपत्र तसेच पदविकास्तरावरील अभ्यासक्रमाचे प्रारूप तयार करून ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जगभरात आपली नवीन ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामाची व संशोधन कार्याची योग्य दखल घेऊन ब्रिटीश सरकारने 1935 साली डॉ. रंगनाथन यांना रावसाहेब हा पुरस्कार दिला. त्यानंतर त्यांनी स्वकष्टाने जमा केलेले एक लाख रुपये मद्रास विद्यापीठाला देणगी म्हणून दिले.

ग्रंथालयशास्त्रातील प्रमाणपत्र बी. लिब., एम. लिब. इत्यादीसाठी अभ्यासक्रम तसेच शारदा रंगनाथन विज्ञान संघटन आणि शारदा रंगनाथन ग्रंथालय शास्त्रपीठ यांची स्थापनाही ऐतिहासिक क्षणामध्ये आजपण गणली जाते.

भारत सरकारने 1957 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मौलिक लिखाणाबद्दल डी. लिट. ही सर्वोच्च पदवी 1947 साली आणि 1964 साली अमेरिकेतील पिटर्सबर्ग विद्यापीठाकडून त्यांना मिळाली होती. वर्गीकरण व तालिकाकरण या विषयातील संशोधनाबद्दल त्यांना १९७० साली अमेरिकन लायब्ररी असोसिशनकडून मार्गारेड हे पारितोषिक देण्यात आले आहे. रंगनाथन यांनी भारतीय ग्रंथालय चळवळही वाढवली. भारतीय ग्रंथालय परिषदांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्याचप्रमाणे युनेस्को इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोशिएशन व इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ डाँक्युमेन्टेशन यासारख्या आंतरराष्ट्रीय समित्यावरही त्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली.

डॉ. रंगनाथन यांच्या कार्याच्या स्मरणार्थ ग्रंथालय चळवळीत योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ते, सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवकासाठी ‘एस आर रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार' देण्याच्या अभिनव योजना सन 1993-94 पासून सुरु केलेली आहे. त्यामध्ये राज्यस्तरावरील एकेक कार्यकर्ता व सेवक यांना रुपये 25 हजार तसेच राज्यातील सहा महसुली विभागातून एकेक कार्यकर्ता व सेवक यांना रुपये 15 हजार, गौरवचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते.

रंगनाथन यांच्या कार्याविषयी कितीही लिहिले तरी ते कमीच आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती अतुलनीय आहे. म्हणूनच डॉ. रंगनाथन यांनी मांडलेले ‘पाच पुस्तकालय विज्ञान’ हे सिद्धांत भारतीय पुस्तकालय विज्ञानाचा पाया समजला जातो. डॉ रंगनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय ग्रंथालयाच्या विकासासाठी अर्पण केले. अशा या महान व्यक्तीला विनम्र आदरांजली.

-नितीन शं. बिनेकर